राष्ट्रसंत तुकडोजी महाराज Rashtra Sant Tukdoji Maharaj.
राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी त्यांना 'तुकड्या' म्हणून हाक मारली. 'तुकड्या म्हणे', असे म्हणत जा, असे सांगितले. 'तुकड्या म्हणे' या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.Rashtra Sant Tukdoji Maharaj.
अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होत.
Rashtra Sant Tukdoji Maharaj.
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होत
विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी सन १९५५ मध्ये तुकडोजी महाराज जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान अत्यंत मोहीत झाले. तुकडोजी महाराज विश्व हिंदु परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतरही राष्ट्रहितासाठी त्यांनी अनेक स्तरावर कार्य केले. बंगाल येथील दुष्काळ, चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध, कोयना भूकंपामुळे उडालेला हाहाःकार या घटनांमध्ये प्रभावित ठिकाणी रचनात्मक मदत कार्याकरिता या सगळ्या मोहिमांवर महाराज स्वतः गेले होते. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.Rashtra Sant Tukdoji Maharaj.




Comments
Post a Comment
हि माहिती माझी वयक्तिक माहिती आहे